बाधति बाधते ।
बाधति बाधते ।
भोजराजा आणि कालिदासाच्या प्रेमाच्या, चातुर्याच्या
अनेक गोष्टी प्रचलित आहेत. कालिदासाच्या प्रकांड बुद्धिमत्तेचे वैषम्य वाटून त्याला
वादविवादात भोजराजाच्या राजदरबारातच राजासमोर हरविण्यााठी आणि राजाने ठेवलेले बक्षिस
जिंकण्याच्या इच्छेने अनेक जण भोज राजाच्या धारानगरीत यायचे. पण कालिदासाला हरविण्यापूर्वीच
कालिदासाचे श्रेष्ठत्व उमगून गुपचूप परत तरी जायचे नाहीतर कालीदासाला भेटून मोकळ्या
मनाने त्याची माफी मागून, त्याचं शिष्यत्व पत्करून, त्याच्याकडे राहून, अभ्यास करून
, शहाणे होउन तरी जात.
असाच एक विद्वान फार लांबून पालखीत बसून धारा नगरीकडे
येत होता. अचानक त्याच्या भोयाचा पाय मुरगाळला
आणि दुसरा भोई घेण्याची वेळ आली. अचानक भोई कुठून मिळणार? म्हणून मग रस्त्यावरच हिंडणार्या
एका माणासाला काही मोबदला देण्याच्या बोलीवर
भोयाचे काम करण्यासाठी निश्चित करण्यात आले.
ह्या नवीन माणसाने पूर्वी कधी भोयाचे काम न करण्याने तो वारंवार थांबत होता. पालखीत
बसलेला विद्वान वजनदार असल्यामुळे मधे मधे पालखीचा दांडा ह्या खांद्यावरून त्या खांद्यावर
करण्यासाठी इतर भोयांना थांबवत होता.
‘आपण धारा नगरीत आलो आहोत त्यामुळे सर्वांवर आपल्या
व्यक्तिमत्त्वाची, सुसंस्कृतपणाची, संस्कृत भाषेची छाप पडायला नको का?’ ह्या विचाराने
त्या विद्वानाने वारंवार खांदा बदलणार्या त्या भोयाला संस्कृतमधे प्रश्न केला ---
‘‘ भूरिभारभराक्रान्तस्तत्र स्कंधो न बाधति? ’’
भूरि म्हणजे मोठा वजनदार. आक्रान्त - वजन लादलेला.
स्कंध- खांदा. बाध- त्रास होणे. म्हणजे ‘‘खूप
वजन तुझ्या खांद्यावर लादलं जाण्याने/उचलण्याने तुला त्रास होत आहे का?’’
आता ह्या वाक्यात बाधति हे क्रियापद चुकीचं वापरलं
गेले आहे. संस्कृतमधे काही क्रियापदं परस्मैपदी असतात तर काही आत्मनैपदी. क्रियापद
परस्मैपदी असेल तर बाधति बरोबर आहे. पण बाध् हे क्रियापद आत्मनैपदी असल्याने बाधते
असं वापरणं योग्य आहे. विद्वानाचा तो प्रश्न ऐकून त्या भोयाने तत्परतेने उत्तर दिले, भारान्न बाधते देव! यथा बाधति बाधते ।।
हे महाजन! आपला चुकीचा वापरलेला ‘बाधति’ हा शब्दप्रयोग जेवढा
बाधत आहे, मनाला रुतत आहे तेवढा हा पालखीचा दांडा वा तुमचा भार मला ‘न बाधते’ म्हणजे बाधत नाही,
खांद्यावर रुतत नाही वा त्रासदायक नाही.
पालखीत बसलेला पंडित चांगलाच चमकला. ज्याला आपण इतकावेळ
सामान्य माणूस, भोई समजत होतो; तो आपली व्यकरणाची चूक काढणारा आहे तरी कोण? असे वाटून
त्याने त्याला विचारले, ‘‘तुला संस्कृत व्यकरणाचे इतके ज्ञान कसे?’’ तेव्हा तो नम्रपणे
म्हणाला, ‘‘महाराज, मी कालिदास पंडिताकडे काही काळ काम केलं होतं.’’ ते ऐकून खजिल झालेला
पंडित कालिदासाशी वादविवाद करायचे सोडून कालिदासाला भेटायला गेला आणि त्याचे श्रेष्ठत्व
मान्य करून त्याचा शिष्य झाला.
-------------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
Comments
Post a Comment